Description
भयावह मायावी काळावकाशाने घडविलेल्या, घडलेल्या आणि घडत असणाऱ्या माणसांच्या कथा या संग्रहात आहेत. तंत्रज्ञान काळातील मानवी जगाची ही अस्वस्थकथा आहे. महानगर आणि मध्यमवर्गीय दृष्टी या कथेचा चित्रणफलक आहे तर सर्व प्रकारची स्खलनशीलता हा या कथेचा प्राण. या काळ घडवणुकीत जुने भुईसपाट होतानाच्या अंतिम घरघरीचे त्यास संदर्भआहेत. या षटकोनी कथेत आजची शोकांत मानवदर्शने आहेत. सर्व तहेची पडझड, सुखवस्तूपणातील परात्मता व एकाकीपण, विचारसरणींचा अंत, चंगळवादाचा उद्रेक, इच्छांच्या पाठलागातील अधुरेपण आणि त्यातून आलेले वैफल्य, सर्व क्षेत्रांतील भडवेगिरी, भविष्यातील भयखुणा, हतबलता आणि डिप्रेशन, व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती आणि कुटुंब तसेच व्यक्ती आणि समाजातील ताणतणावाच्या या स्फोटक दुःखकथा आहेत. वास्तव हे एकेरी नसते तर ते बहमिती असते, याचा गडद प्रत्यय या कथांत आहे. तर अनेकविध भ्रमाचे वास्तवात रूपांतर झालेल्या या कथा आहेत.
कुरुलकर यांची कथा गोळीबंद आणि बहुपेडी असून, त्यांच्या कथेचा बंध हा दीर्घकथेचा असून तो कादंबरीकडे झेपावणारा आहे. कथाअंतीच्या किंकाळी, ओरडणे (कधी मौनात), रडण्याच्या संदर्भबिंदूंनी या कथांना करुण शोकांतकथेचे रूप प्राप्त झाले आहे. आकस्मिक उद्भवलेले मरणनाट्य हा या कथेचा गाभा आहे. कुरूलकरांची ही आत्मनिवेदनात्म कथा बहुमुखी आहे. तर त्यांच्या कथेचा शेवट खुला आणि प्रसरणशील आहे. तसेच ते पात्रांच्या बाबतीत पक्षपाती नाहीत. त्यामुळे ‘इस शहर में हर शख्स परेशानसा क्यूं?’ असणाऱ्या माणसांच्या या मन विदीर्ण करणाऱ्या कथा आहेत. उगवत्या शतकाच्या आरंभकाळातील सर्वनाशाच्या कठड्यावर उभ्या असणाऱ्या माणसांच्या या डेड एन्डच्या कथा वाचकांना अंतर्मुख करतात.
रणधीर शिंदे