Description
‘होळकरशाहीचा इतिहास’ हा होळकरशाहीच्या इतिहासाचा दोन खंडांचा ग्रंथ आहे. इंदूरची होळकरशाही ही मराठेशाहीचेच एक अंग होती. मराठेशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ होती. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार पेशव्यांच्या काळात झाला. थोरल्या बाजीरावांच्या कारकीर्दीत मराठा सत्तेने अटकेपर्यंत मजल मारली आणि उत्तरेत थेट दिल्लीच्या तख्तावर आपला अंमल प्रस्थापित केला.
मराठेशाहीच्या इतिहासात शिंदे, भोसले, दाभाडे, पवार अशा ज्या अनेक घराण्यांनी मराठा सत्तेचा परीघ विस्तारण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली त्या घराण्यांपैकी एक महत्त्वाचे घराणे म्हणजे इंदूरचे होळकर घराणे. होळकरशाहीचा पाया रोवला मल्हारराव होळकरांनी. ते होळकर राज्याचे मूळ पुरुष त्यांनी माळव्यात इंदूरला होळकरांचे राज्य निर्माण केले. ते मराठेशाहीचे आधाराचे खांब होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक लढाया लढल्या आणि त्या सर्वांमध्ये विजय मिळविला. मराठेशाहीच्या उत्कर्षात मल्हारराव आणि होळकर घराणे यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
होळकरशाहीचा पाया मल्हाररावांनी मजबूत बनविला त्यावर सर्व अंगांनी कळस चढवला तो अहिल्याबाई होळकर यांनी. प्रशासन, शेती, पाणी, न्याय, स्त्रीहक्क, परराष्ट्रसंबंध, युद्धनीती अशा अनेकविध बाबतीत त्यांनी सर्वदूर सुधारणा केल्या आपल्या राज्यात शांतता, सुरक्षितता आणि प्रजाहित या बाबी त्यांनी महत्त्वाच्या मानल्या. शिवरायांच्या लोककल्याणकारी राज्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवला. केदारनाथ, बनारस, सोमनाथ आणि रामेश्वर अशा भारताच्या चारी दिशांना लोकहिताची कामे करून या सामाजिक कार्यातून त्यांनी भारत देशाला जोडण्याचे काम केले. पुण्यश्लोक, देवी, लोकमाता अशा उपाधी लोकांकडून मिळविणाऱ्या त्या जगाच्या इतिहासातील एकमेव महाराणी होत्या.
अहिल्याबाईंनंतरही होळकरशाहीतील लोककल्याणकारी राज्याची परंपरा थांबली नाही. प्रथम यशवंतराव, हरीराव, द्वितीय तुकोजीराव आदी राजांच्या कारकीर्दीत होळकरशाहीच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. होळकरशाहीचा कालावधी इ. स. १७२८ ते १९४८ असा २२० वर्षांचा आहे. या कालखंडात होळकर राज्यकर्त्यांनी होळकरशाहीचा इतिहास संपन्न केला. ब्रिटीश राजवटीत जी राज्ये लोककल्याणकारी नि प्रागतिक होती त्यात इंदूरच्या होळकरशाहीचे नाव वरच्या स्थानी होते. बडोदा येथील सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू महाराज आणि इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांच्या लोकाभिमुखी आणि जनहितकारी कारकीर्दीची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली आहे.
भारतीय मध्यकालीन इतिहासात मराठा सत्तेचे आणि मराठेशाहीत होळकरशाहीचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे.









Reviews
There are no reviews yet.