Description
चवदार तळ्याच्या लढ्यांत मिळालेला विजय !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली स्वाभिमानाची आणि माणुसकीच्या हक्काची चळवळ १९२७साली मार्च महिन्याच्या १९ व्या तारखेस सुरु केली. आणि अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची मुहूर्तमेढ रोविली होती. महाड येथील चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा आपला समान हक्क आहे अशी अस्पृश्य बांधवांनी मागणी करुन त्याप्रमाणे चळवळ सुरु करताच येथील सनातनी व काही विघ्नसंतोषी स्पृश्यानी या समान हक्काच्या लढ्यास विरोध केला आणि अस्पृश्यांविरुध्द मनाई मिळून कायदेशीर रितीने या चळवळीला प्रतिबंध केला होता. परंतु हा दावा महाडच्या सब-जज्जांनी काढून टाकल्यावर याच सनातनी मंडळींनी त्यांच्याविरुध्द ठाणे कोर्टात अपिल केले. तेथे बरेच दिवस या खटल्याबाबत काम होऊन शेवटी याहि कोर्टाने खालच्या कोर्टाच्या हुकुमान्वये निकाल देताच महाडच्या स्पृश्य मंडळींनी पुन्हा एकदा प्रयत्न करुन, अस्पृश्य समाजाच्या या समान हक्काच्या लढ्याचा नायनाट करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडे धाव घेतली. येथे हे अपिल बरेच दिवस लांबणीवर पडले. परंतु शेवटी गेल्या महीन्यात सुनावणीस निघाले. या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर चौघे अस्पृश्य प्रतिनिधी यांना प्रतीवादी केले होते. कोर्टाने या खटल्याची सर्व प्रकारची हकिगत, तेथील परिस्थिती, या तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि जुना रितीरिवाज याविषयी माहिती करुन घेतली. आणि काही दिवस निकाल देण्याचे तहकूब करुन शेवटी तारीख १७-३-३७ रोजी न्या. मू. ब्रमफील्ड यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यांनी निकालात स्पष्टपणे सांगितले की, चवदार तळ्याच्या मालकीबद्दल आता वादीचे काही म्हणणे उरलेले नाही. परंतु लैंड रेव्हेन्यू कोड प्रमाणे महाडचे चवदार तळे हे सरकारच्या मालकीचे होते. आणि डी. म्यु. अॅक्टाप्रमाणे सध्या या तळ्याची मालकी महाड म्युनिसिपालटीकडे आहे. असे प्रतिवादीने प्रतिपादन केले आहे. ह्या तळ्याचा मुसलमानासारख्या अहिंदू समाजाकडूनही उपयोग केला जातो. यावरुन फक्त स्पृश्य लोकांनाच या तळ्याचा उपयोग करण्याचा हक्क पोहचत नाही. तथापि प्राचीन काळी या तळ्यावर अस्पृश्य लोकांना पाणी भरण्याची व पिण्याची मनाई होती असे वादींचे म्हणणे आहे. परंतु या प्राचीन रुढीने वादीला कायदेशीर हक्क पोहचत नाही. तशांत ही प्राचीन रुढी आहे असेहि वादींना समाधानकारकरित्या पुराव्याने सिध्द करता आले नाही.’ अशारितीने या खटल्यात शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी झाले. आणि महाडचे चवदार तळ्यात यापुढे अस्पृश्यांना कायदेशीर रितीने पाणी पिण्यास व वापरण्या हक्क प्राप्त झाला आहे. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण चळवळीची जी दहा वर्षापूर्वी मूहूर्तमेढ केली होती त्यात आज अपूर्व असे यश मिळाले आहे. यावरुन संघटना आणि शिस्त या चळवळीने आपल्याला कोणतेही अवघड कार्य कसे यशस्वी करता येते याचे अवलोकन करणे अवघड नाही. या खटल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादि प्रतिवादीतर्फे मि. गुप्ते व मि. मोडक वकील यांनी कायद्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीस ते अभिनंदनास प्राप्त आहेत.
(संदर्भ जनता, दिनांक २७ मार्च १९३७)






Reviews
There are no reviews yet.