Description
चंद्रमाधवीचे प्रदेश / ग्रेस
ग्रेसच्या निर्मितीचाच नव्हे तर समग्र मराठी साहित्यातील pure poetry च्या कक्षेचा परीघ विस्तीर्ण करणारी कविता म्हणजे ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ संगीताच्या इतक्या निकट जाणारी तरल कविता मराठीत अभावानेच जाणवते. मातीतून उगवणाऱ्या देहनिष्ठ घायाळ प्रतिमांनी व मानवी प्रारब्धाच्य प्राणनिष्ठ रौरवी आवर्तानी ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ झपाटलेले आहेत.
अशा द्वैती तणावामुळे ही कविता काव्यास्वादाबाबत फार महत्त्वाचे प्रश्न निर्माण करते. पण शब्दांच्या सोलीव कातीव अर्थाच्या बरबादीनंतर, संवेदनानिष्ठ स्वयंभू संवादासाठीच जन्मलेली ती स्वायत्त परिभाषा असल्यामुळे तिचे खिळवून ठेवण्याचे सामर्थ्यही अचाट आहे. राघव, जानकी, ऊर्मिला इत्यादी पौराणिक व्यक्तींशीदेखील ग्रेस आत्मसंवेदनेच्या तरल पातळीवर संवाद साधतात, एकाच वेळी हा रूढ प्रतिमेचा अंत व पुनर्जन्म असतो.
ह्यामुळे ‘मिथ’चा रूढ अर्थ कळून आस्वाद हळूहळू निर्वेध होत जातानाही जाणिवेला ठणका बसतच राहतो. आई, चंद्र, सती, घोडा, गंगा इत्यादी कवीच्या आयुष्यभर पाठलाग करणाऱ्या संकेतांची पुनरावृत्ती कवितेच्या एकसंध आत्मप्रत्ययाची काही दालने मोकळी करून देते; पण ह्या कवितेतील अनुभवाची प्रतच मराठीत अनुवंशहीन असल्यामुळे दुःख, उदासी, मृत्यू, ख्रिस्तकरुणा आदी घटनांच्या व्यामिश्र अस्तित्वाचा पेच उरतोच. जर्मन कवी रिल्के ह्याच्या गहनगंभीर काव्यजाणिवेशी फार जवळचे नाते सांगणारी निर्मोही आक्रंदनशैली आहे ही. मानवी आयुष्यातील अपरिहार्य प्रश्नांची कठोर समंजस जाण आणि क्षणाच्या संचितावर सिद्धांतांचे दडपण न येऊ देणारी नितळ अभिव्यक्ती ही ग्रेसच्या कवितेची वैशिष्ट्ये. त्यामुळे ह्या कवितेतून मूलभूत प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत, तर प्रश्नच मुळातून अधिक समृद्ध होत जातात, त्यातील अंगभूत द्वैतासकट. निर्मितीच्या रंध्रारंध्रात प्रश्नांच्या वैयक्तिक निमित्तांचे विसर्जन व त्यांच्या वैश्विक विराटतेचे सृजन ही प्रक्रिया सतीच्या वाणासारखी भिनून गेलेली असल्यामुळे दुर्बोधतेच्या अग्निदिव्याला सिद्ध होणे हे ह्या कवितेचे अटळ प्राक्तन आहे.






Reviews
There are no reviews yet.