C. T. Khanolkar | चिं. त्र्यं. खानोलकर

C. T. Khanolkar | चिं. त्र्यं. खानोलकर

चिंतामण त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) – C. T. Khanolkar

विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक लेखन करणारे कवी/लेखक अनेक असतात. आपापल्या परीने ते मोठेही असतात. पण ‘प्रतिभा’ ही निसर्गदत्त/ईश्वरदत्त देणगी असते, असे म्हणायला लावणारे काही मोजकेच कवी/लेखक असतात. आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर) हे अशा मोजक्या साहित्यिकांपैकी एक. ‘मी मातीचे ऋण फेडाया देवाघरून आलो’ असे त्यांनी आपल्या एका कवितेत म्हटले आहे आणि त्यांचे लेखनकर्तृत्व पाहता या ओळीची सत्यता प्रतीत होते.

खानोलकर यांचा जन्म बागलांची राई, तेंडोली, ता.वेंगुर्ले, जि.सिंधुदुर्ग येथे झाला. त्र्यंबक विश्राम प्रभुखानोलकर आणि सुंदराबाई या दांपत्याचे हे सहावे अपत्य होते. बागलांची राई येथे चिदानंद स्वामींचा मठ आहे. आपल्याला लाभलेले प्रतिभेचे देणे हा चिदानंद स्वामींचा कृपाप्रसाद आहे, असे खानोलकर मानीत असत. नवीन लेखनाला प्रारंभ करण्यापूर्वी ‘श्री चिदानंद स्वामी प्रसन्न’ असे ते लिहीत असत. त्यांच्या लेखनात हा मठ आणि त्याचा परिसर याचे चित्रण विविध स्वरूपांमध्ये आलेले आहे.

तेंडोली, वेंगुर्ले, सावंतवाडी, मुंबई, कुडाळ अशा अनेक ठिकाणी स्थलांतर होत-होत खानोलकरांचे बालपण व्यतीत झाले. कुडाळ हायस्कूलच्या ‘बालार्क’ या वार्षिकांकात खानोलकारांची ‘भवितव्य’ ही कविता व ‘मोगर्‍याची वेणी’ ही कथा प्रसिद्ध झाली. यानंतर वर्षभरातच, १९५१ मध्ये त्यांची ‘जाणीव’ ही कथा सत्यकथेत प्रसिद्ध झाली. सावंतवाडीतील ‘वैनतेय’ या साप्ताहिकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी सत्यकथेत कविता प्रसिद्ध होण्यास काहीसा विलंब झाला. ‘आरती प्रभू’ या टोपणनावाने पाठविलेली त्यांची ‘शून्य शृंगारते’ ही कविता १९५४ मध्ये प्रसिद्ध झाली. या स्त्रीनामसदृश टोपणनावाचे कुतूहलही काही काळ साहित्यविश्वात होते, मात्र लवकरच सर्वांना योग्य तो खुलासा झाला. कवितालेखनासाठी ‘आरती प्रभू’ हे टोपणनाव मात्र कायम राहिले.

खानोलकरांनी किशोरवयापासून साहित्यप्रेम जपले आणि या साहित्यप्रेमाने त्यांची संगत अखेरच्या दिवसापर्यंत सोडली नाही. मृत्यूपूर्वी आठवडाभर, ते काही काळ शुद्धीवर आले असता, त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ.देवल यांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘अखेरच्या वळणावर यावा। मंद सुगंधी असा फुलोरा। थकले पाउल सहज उठावे। आणि सरावा प्रवास सारा’ ही आपली अखेरची कविता म्हटली. त्यांचा प्रत्येक श्वास जणू साहित्याशी जोडला गेला होता.

सेहेचाळीस वर्षांच्या आयुष्यात खानोलकरांनी जी विपुल साहित्य निर्मिती केली, ती थक्क करणारी आहे. ‘खानोलकरांचा लिहीण्याचा वेग व निकड एवढी होती की, त्यांच्या लेखनाच्या झपाट्याला एक प्रकाशनसंस्था पुरी पडणे कठीणच होते’ अशी नोंद त्यांचे प्रमुख प्रकाशक श्री.पु.भागवत यांनी केलेली आहे. व्यक्तिगत आयुष्यात फार मोठे चढ-उतार खानोलकरांच्या वाट्याला आले. गर्भावस्थेत असताना त्यांच्या मातेवर गर्भपातासाठी झालेला एका ‘मुळी’चा प्रयोग, वडिलांकडून सतत दुजाभाव, शिक्षणाची परवड, पुढे व्यावसायिक अस्थैर्य, समकालिनांकडून झालेला उपहास, मुलाचा अकाल मृत्यू, काही मित्रांच्या मदतीने मुंबईत लाभलेली नोकरी, नोकरीतही अस्थिरता, शारीरिक व्याधी अशा खाचखळग्यांनी त्यांचे आयुष्य भरलेले होते. हे लौकिक अनुभव आणि कलावंत म्हणून घेतलेले भावानुभव यांची प्रतिक्रिया खानोलकरांच्या लेखनात अपरिहार्यपणे उमटली.

‘जोगवा’(१९५९), ‘दिवेलागण’(१९६२) आणि ‘नक्षत्रांचे देणे’(१९७५) या आरती प्रभूंच्या तीनही कवितासंग्रहांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले. ‘नक्षत्रांचे देणे’ला साहित्य अकादमी पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला. त्यांच्या असंग्रहित आणि अप्रकाशित कवितांची संख्याही बरीच मोठी आहे. ‘सनई’ (१९६४), ‘राखी पाखरू’(१९७१), ‘चाफा आणि देवाची आई’ (१९७५), व ‘बाप’ हे खानोलकरांचे चार कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तेरा कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. ‘कोंडुरा’ (१९६६), ‘रात्र काळी घागर काळी’(१९६२), ‘अजगर’ (१९६५), ‘पाषाणपालवी’ (१९७६), ‘भागधेय’ या त्यांतील प्रमुख कादंबर्‍या होत. पुस्तकरूपात प्रसिद्ध न झालेल्या आणखीही तीन कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. सर्व साहित्यप्रकारांपैकी सर्वाधिक लेखन त्यांनी नाटकांचे केलेले आहे. दहा प्रकाशित आणि एकोणतीस अप्रकाशित अशी एकोणचाळीस नाटके त्यांनी लिहिली. यांपैकी ‘एक शून्य बाजीराव’ (१९६६), ‘अवध्य’ (१९७२), आणि ‘कालाय तस्मै नमः’ (१९७२) या नाटकांनी खानोलकरांना नाटककार म्हणून नावलौकिक मिळवून दिला. ‘हयवदन’ आणि ‘अजब न्याय वर्तुळाचा’(१९७४) या त्यांनी रूपांतरित केलेल्या नाटकांचाही बराच बोलबाला झाला. काही एकांकिका, ‘गोपाळ गाणी’ हा बालगीतांचा संग्रह तसेच ‘वारा वाजे रुणझुणा’ आणि ‘दीपमाळ’ हे ललित गद्यलेखनही खानोलकरांनी केले.

माहिती सौजन्य: महाराष्ट्र नायक

Books By C. T. Khanolkar | चिं. त्र्यं. खानोलकर