Description
‘मनुष्य हा गाणारा प्राणी आहे’ अशी मानवाची एक व्याख्या हॅम्बॉल्ट या भाषा शास्रज्ञाने केली आहे. मात्र गीतपरंपरेपेक्षा नृत्यकलेची परंपरा अधिक प्राचीन असून नृत्यकलेतूनन आदिमानव आपला भावनाविष्कार करीत असे, मानवी संस्कृतीच्या प्रारंभकाळात या नृत्यामधूनच गीतरुप हळूहळू उत्क्रांत होत गेले. शब्द, संगीत, नृत्य हे तीन घटक एकवटून बनलेली संघटना म्हणजे गीत होय. पुढे कर्णमधूर स्वररचना सामाजिक विधिउत्सवाच्या अविभाज्य घटके बनल्या. अशाप्रकारे स्वररचनांनी बनलेले आदिगीत जन्माला आले.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील नेटाळी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावात माझे बालपण गेले आहे. आमच्या घरी गणपती-गौरीचे आगमन झाले की, गावातील तसेच जवळपासच्या गावातील नृत्य मंडळे नृत्य करण्यासाठी घरी येत असत. त्यामुळे त्यांची लोकगीते मनावर कायमची कोरली गेली. पुढच्या काळात लोकसाहित्याच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाने नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे आदिवासींची संस्कृती, परंपरा, नृत्य, विधिनाट्य यांचा अभ्यास करून वेळोवेळी शोधनिबंध सादर केले. त्यातूनच या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.