Description
अनेक पातळ्यांवर स्वप्नं घेऊन जगणारी माणसं, त्यांची जगण्याची तत्त्वनिष्ठ धडपड, आयुष्यात होणाऱ्या उलथापालथींमुळे जगण्याची बिघडलेली लय यातून उभ्या राहणाऱ्या पंकज कुरुलकर यांच्या कथा मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान मांडू पाहतात. या कथांमधून उभा राहणारा कथाशय अनेकविध प्रश्नांमधून चिंतनाला प्रवृत्त करतो. त्यांच्या स्त्रीकेंद्री कथांमधून उभी राहणारी स्त्री वेगळ्या वाटेवर जाणारी आहे. स्त्रीपुरुष नातेसंबंधांची ही वीण तिच्यातील स्त्रित्त्वाचे अनेक कंगोरे उलगडणारी आहे. सामान्यांपासून उच्चभ्रूपर्यंतच्या सर्व थरांतील माणसे या कथेच्या केंद्रस्थानी येतात. माणसांच्या जीवनातील गुंतागुंत चित्रित करणारी कुरुलकरांची कथनशैली वाचकांना मोहात पाडणारी असली तरी ज्या सूक्ष्मपणे जगण्यातले बारकावे ही कथा मांडते; त्यातूनच कथाकार म्हणून असणारी त्यांची लेखनवैशिष्ट्येही नजरेत भरतात. कथेचे प्रवाही व धावते निवेदन, संयत अभिव्यक्ती, प्रसंग खुलवण्याची क्षमता, जगण्याविषयीचे प्रश्न उपस्थित करून बदलत्या जीवनशैलीचे भलेबुरे परिणाम चित्रित करण्याची हातोटी, यामुळे ही कथा रंजकतेच्या पल्याड जाऊन चिंतन-मननाच्या पातळीवर मनात रेंगाळत राहते. अंधाराला भेदून प्रकाशाची तिरीप शोधणारे हे कथा विश्व आहे. बदलता काळ, बदलते जीवनमान, बदलत गेलेले प्रश्न यांची संवेदनशील मांडणी करणारी पंकज कुरुलकर यांची कथा त्यांच्या मोहक शब्दशैलीमुळे वाचकांशी थेट संवादी होऊन जाते. ही तर आपलीच कथा आहे, आपल्याच अवतीभवती घडते आहे, याचे भान आणून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथालेखनात असल्याने मराठी कथाविश्वातील ठळक व लक्षणीय कथाकार म्हणून त्यांची नोंद घेणे अपरिहार्य ठरते.