Description
अस्वस्थ मी, अशांत मी
नीरजा
मराठी कथा आणि काव्यविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभासामर्थ्याने आणि सर्जनशील सौंदर्याने स्वतःचा असा स्वतंत्र अवकाश निर्माण करणाऱ्या नीरजाने ‘जे दर्पणी बिंबले’, ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसे ‘च्या पाठोपाठ आलेल्या ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ या संग्रहात समाविष्ट केलेल्या कथांतून जाणिवांच्या विस्तारलेल्या कक्षांचे दर्शन घडवले आहे आणि हृदयाच्या अंर्तहृदयातून येणारी अस्वस्थता आणि अशांतता अत्यंत प्रगल्भपणे व्यक्त केली आहे.
नीरजाच्या या कथा बिचारी आणि संवेदनशील बाईच्या वाट्याला अटळपणे येणारे एकाकीपण, एकटेपण, भावनांची आणि विचारांची आंदोलने, स्वातंत्र्यासाठी द्यावी लागणारी किंमत, मनाचा कोंडमारा, असहायता आणि त्यावर मात करण्याची धडपड, स्त्री-पुरुष संबंधात निर्माण होणारे अंतर, दुरावा, मतभेद, संघर्ष, समजगैरसमज, त्यांतून आलेली अवकळा यांची प्रखर अभिव्यक्ती करतातच, पण त्याचबरोबर बाईचं शरीर आणि मन गृहीत धरणारी, तिला माणूस म्हणून दुय्यमता देणारी, तिचे सर्वंकष शोषण करणारी, जे जे प्राकृतिक आहे, नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे, ते गिळंकृत करणारी, निवडीचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी ही जी व्यवस्था आणि संस्कृती आहे, तिलाही अधोरेखित करतात. या व्यवस्थेतील लबाडी, हपापलेपण, लाचारी, लंपटपणा, दुटप्पीपणा आणि खोटेपणाही दाखवून देतात. लिंगभेदभाव कसा जोपासला जातो आणि त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम कसे होतात ते सांगतात. लिंगभावाची ही संकल्पना नैसर्गिक आणि मूलभूत नसून सांस्कृतिक आहे आणि ‘स्त्री’ हे एक सोयीस्कर ‘रचित’ आहे असा भावार्थ या कथांतून पाझरत राहतो.
स्त्रीत्वातून सुरुवात करून माणूसपणाचा शोध घेणाऱ्या या कथा आहेत आणि त्यामागे आत्मप्रामाण्य, आत्मभान, आत्मशोध, आत्मप्रत्यय, आत्मविश्वास आणि आत्मबळ देणाऱ्या मूल्यांचे भान कार्यरत आहे.
– अविनाश सप्रे






Reviews
There are no reviews yet.