Description
यातील कविता संघर्षात जगणाऱ्या समूहांच्या जाणिवांची विस्तृत अभिव्यक्ती करणारी, नव्या प्रतिमांनी आशयसमृद्ध झालेली आहे. मराठीमुस्लीम तरुण मनाची होणारी होरपळ आणि त्यांच्या रक्तात भिनलेली प्रादेशिकता यांतील आंतद्वंद्व हा या कवितेचा गाभा आहे. या तरुणांच्या भोवताली विचित्र घटनांचा आग्यामोहोळ घोंघावतो आहे. त्यांना अस्वस्थतेसह रोजमर्राच्या प्रश्नांनी घेराव घातलेला आहे. यात मुस्लीमजाणिवांना सार्वजनिकतेचे रूप प्राप्त झालेले आहे. ही कविता कोणत्याहीं प्रादेशिक भाषेत अनुवादित झाली तरीही ती माणूसपण जपणाऱ्या कोणत्याही संवेदनशील मनाला झोंबल्याशिवाय राहणार नाही. मराठीमुस्लीम म्हणूनच्या जाणिवांची विस्तृतता, अंतर्यामीचा कोंडमारा, अभिव्यक्तीतील नितळ स्पष्टता, बदललेली तिरकस-तिरसट भाषा ही या कवितेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. उपरोध आणि स्वक्षतीने भरलेला उपहास या संग्रहातून अधिक गडद होत राहतो.
– कवीचे मन सर्वच प्रमुख वैचारिक द्वंद्वाच्या वर्तमानकालीन स्वरूपामुळे गोंधळून अस्वस्थ होत राहते. जागतिकीकरण, उदारीकरण अन् बाजारीकरणाने मानवी जगणेच बदलले आहे. एकूणच काय तर व्यवस्था आणि सत्ता जेव्हा तथाकथित धर्माच्या आग्रही राष्ट्रवादाच्या आधारे व बहुलसंमत संगनमताने बनवाबनवी करते तेव्हा असह्य होणाऱ्या अमानवी घटनांचे आपणच कसे बळी ठरतोय ? अशा प्रश्नांचा सल यातून ठसठसत राहतो. न्याय हक्क-स्वाभिमान अशा शब्दांचा चुराडा झाल्यावर जगायचं तरी कसं? वर्तमानच नासून जाते आहे, भूतकाळ खोदून खोडला जातो आहे… अशा वेळी रुतून उगवलेली आंतर्बाह्य अस्वस्थता कमालीच्या भाषेचा स्वर घेऊन येते.
साहिलच्या कवितेने मराठीला मुस्लीममराठीपणाचा नवा लहेजा दिला आहे. त्त्याला लिहिताबोलता ठेवायला हवा. येणाऱ्या काळात त्याची कविता या काळाचे डॉक्युमेंटेशन म्हणून खूप महत्त्वाची उरणार आहे. त्याने लिहिते सहावे.
– फ. म. शहाजिंदे









Reviews
There are no reviews yet.