Description
‘कोणे एके काळी, एक होता राजा’ ही गोष्टीची सर्वात सुंदर अशी सुरुवात आहे, असं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी म्हणून ठेवलं आहे. रेणू गावस्कर यांच्या ‘गोष्टी जन्मांतरीच्या’ या पुस्तकात गोष्टींच्या या सुंदर परंपरेचं जतन करण्याचा प्रयत्न अतिशय संवेदनशीलतेनं केल्याचा प्रत्यय ठायी ठायी येतो.
रेणू गावस्करांनी समाजातील सर्व स्तरांतील मुलांसाठी (मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीसुद्धा) कथाकथकाची भूमिका गेली कित्येक वर्षं समर्थपणे पार पाडली आहे. त्यातूनच त्यांच्याकडून कथा या विषयाचा सखोल अभ्यास होत जाणं स्वाभाविकच होतं. हा गोष्टीरूप अभ्यास प्रस्तुत पुस्तकातून इतक्या अंगानं वाचकांपुढे येतो की त्यांचं मन विस्मित होऊन जावं.
‘गोष्टी जन्मांतरीच्या’ या पुस्तकातील लेखिकेची भूमिका एका कथाकथकाची आहे. त्या माध्यमातूनच एकामागून एक अशा कितीतरी गोष्टी अतिशय प्रवाही भाषेत वाचकांपुढे, एखादं तलम वस्त्र उलगडावं, तशा उलगडत जातात. या गोष्टी मानवी जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श करतात. काही जीवनमूल्यांचा उलगडा करतात, तर काही जीवनरहस्यं तशीच मूठबंद ठेवतात. यातूनच जे उघडं झालं आहे, त्याचा आस्वाद घेण्याची आणि जे बंद आहे ते शोधून काढण्याची उत्कंठा वाचकाच्या ठायी निर्माण होते.
रेणू गावस्कर यांची लेखनशैली सोपी तर आहेच, शिवाय ती संवादाच्या अंगानं जाणारी असल्यानं वाचकांच्या मनाला स्पर्श करून ती त्यांना आपलंसं करून घेते.
वरवर बघता ‘गोष्टी जन्मांतरीच्या’ मुलांसाठी आहेत असं वाटलं, तरी त्यातली प्रत्येक गोष्ट, तिच्या पोटात दडलेल्या अर्थगर्भतेनं, मोठ्यांच्या मनातही आपलं घर करील यात काहीच शंका नाही.






Reviews
There are no reviews yet.