Description

सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत यांची कविता धर्म आणि राजसत्तेच्या वर्तनव्यवहारातला उन्माद, गुदमरून टाकणारे जहरी पर्यावरण, झुंडशाहीने फिरणारे अस्मितांचे कळप, या मंत्रभारित काळात दुबळ्यांच्या जगण्यावरच केले जाणारे अघोरी उपाय अशा आजच्या युद्धमान काळाला शब्दांत साकारणारी आहे. ‘मी गमावत चाललोय आयुष्याचा एकेक परगणा’ अशी हासशील जाणीव व्यक्त करणारा कवी ‘माझे साम्राज्यच धोक्यात आलेय’ असे म्हणत प्रेमभावनेतही युद्धाचीच प्रतीके, प्रतिमा योजतो हाही धुमसत्या, अस्वस्थ आणि गरगरून टाकणाऱ्या काळाचाच विशेष आहे. एका अर्थाने ही काळवंडलेल्या वर्तमानाची नोंद आहे.

ऐतिहासिक संदर्भ, आख्यायिका, मिथके, प्राचीनतेचा वर्ख असलेल्या प्रतिमा याद्वारे कवी थेट समकालाचा आडवा छेद घेतो हे अन्वर्थक आहे.

उत्तर आधुनिकतेच्या नावाखाली एकसुरी, एकसाची प्रसवल्या जाणाऱ्या कवितेच्या कोलाहलात वेधक प्रतिमासृष्टीद्वारे स्वतःचा वेगळा स्वर जपणारी ही कविता आहे. त्यामुळेच अस्तित्वशोधाची कवीची धडपड निरर्थक वाटत नाही आणि परात्मतेच्या भुयारात शिरताना ती चाचपडत नाही. शोषणकर्त्या जुन्या गढ्या आणि नवे टॉवर्स कोसळण्याची आकांक्षा बाळगणारी ही कविता ‘माणुसकी’ हा शब्द नव्या लिपीद्वारे लिहिण्याची आस बाळगून आहे. ही या कवितेची आश्वासक खूण म्हटली पाहिजे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kalya Jadooche Avshesh | काळ्या जादूचे अवशेष”

Your email address will not be published. Required fields are marked *