Description
नीरजाची कविता ही साधी थेट न् तरीही सार्वत्रिक अशी आहे. वयात आलेल्या मुलीपास्नं दंगल, तृष्णेचा प्रश्न, महिला स्पेशल, वाळकेश्वर, महाभारतातील द्रोणाचार्य, धृतराष्ट्र, द्रौपदी हे तिहि कवितेचे विषय पाह्यले की चकित व्हायला होतं. महाभारताने साऱ्या माणसांबद्दल एकदाच फायनलच बोलून टकालंय, मग बोलायला काय उरतं? पण नीरजाची द्रौपदी जेव्हा “मोकळ्या केसात माळावा गजरा लाल तांबड्या मांसाचा”, अशी दचकवून टाकणारी ओळ लिहिते तेव्हा त्या शोकान्त बीभत्स, संहारक उपहासाची विसंगत दहशत या विरोधाभासामुळे कुठंतरी करुणा, त्याचवेळी नकोसेपण जाणवून जाते तीव्रपणे. ईश्वराबद्दल ती सहज लिहून जाते की, ‘ईश्वर मरणाचं ओझं वाही’ ही ब्लॅक कॉमेडी अॅब्सर्डिटीकडे जाणारी चमकदार ओळ वाचली की एकाच वेळी दोन किंवा त्याहून अधिक गोष्टींकडे ती कमालीच्या वेगळ्याच दृष्टीने बघताना दिसते. अर्थात कवी वेगळंच काहीतरी बघतो. पण आताच्या कंन्सेप्टमधलं व्यवस्थेतलं कवीचं बघणं बदललंय… जास्त टोकदार, खोल घाव घालणारी पण तरीही ईश्वरापासून दंगलीपर्यंत अशा सर्वांवर कधी खोचक कधी भेदक भाष्य करणारी नीरजाची कविता सार्वत्रिकाशी आपसूक बांधली जाते. जसं
“म्हातारी वाट पाहते आहे ऋतू बदलण्याची
आणि पोरीच्या अंगात तर
पावसाळाच रु तून बसलेला कायमचा !”
असं काहीतरी भलतंच मायावी मर्मभेदक ती लिहून जाते. नीरजाच्या कवितेला ही सृजनाची शक्ती आहेच. पण साधी सोपी कविता लिहिणं भलतं कठीण आहे. ते तिचा पक्केपणी पाय रोवून ठेवतं. हा साधा सोपा पण अवघड कवितिक सार्वत्रिकपणा कायम तिच्या कवितेचा स्थायीभाव राहावा हीच इच्छा.
मलिका अमर शेख






Reviews
There are no reviews yet.