Description
साहित्यकृतीच्या सूक्ष्म, विचक्षण, मार्मिक आकलनातूनच साहित्यकृतीच्या अर्थनिर्णयाला मौलिकता आणि विश्वासार्हता प्राप्त होत असते. याची प्रचीती देणारे समीक्षालेखन सदर पुस्तकातून प्रभावीपणे येते. समकालीन निवडक कादंबऱ्या, कविता, आत्मकथने आणि ललितगद्य यांचे साहित्यकृती म्हणून असणारे अस्तित्व तपासून त्याची प्रतिष्ठापना करणारे साहित्यकृतीकेंद्री समीक्षालेखन सदर पुस्तकातून प्राधान्याने आले आहे. साहित्यकृतीच्या केवळ आशयाची ही चर्चा नव्हे, तर विशिष्ट साहित्यप्रकाराच्या रचनाबंधाच्या अनुषंगाने आलेली अभिनवता आणि प्रयोगशीलता यांचाही सूक्ष्म शोध घेण्याची भूमिका येथे महत्त्वाची मानलेली आहे. वाङ्मयीन संस्कृती आणि वाड़मयेतिहास या अंगांनी मांडणी करणारे सदर पुस्तकाच्या पहिल्या भागातून आलेले लेख समकालीन साहित्यसमीक्षेच्या समृद्धतेत मौलिक भर घालणारे आहेत. भाषा, संस्कृती, विशिष्ट कालखंड, सामाजिक संदर्भ, अध्यापन प्रक्रिया अशा विभिन्न संदर्भातून वाड्मयीन संस्कृतीच्या अंतरंगात डोकावून पाहून तिचे मर्म ग्रहण करू पाहणारी सदर लेखांतील मांडणी संदर्भसंपन्न आणि विशिष्ट दृष्टी प्रदान करणारी आहे. मनःपूर्वकतेने आणि मूलगामीपणे साहित्याचा तळठाव धुंडाळण्याची ऊर्मी सदर पुस्तकातील लेखांतून सतत जाणवते. या प्रक्रियेतून उन्नत होत जाणारा साहित्याकलनाचा स्तर आणि खुल्या होत जाणाऱ्या साहित्यान्चयार्थाच्या दिशा समकालीन वाङ्मयीन पर्यावरणाला समृद्ध करणाऱ्या आहेत.
–आशुतोष पाटील