Description
हे लेखन म्हणजे मराठी संस्कृतीचं, प्रादेशिक भाषेचं, गावजीवनाचं दस्तऐवज आहे. कालानुसार किंबहुना प्रदेशानुसार संस्कृती बदललेली दिसते. ते बदल या लेखनातून आपोआप टिपले गेले आहेत. रीतिरिवाज आणि रीतिसंस्कार यांचा परिपोष लेखिकेनं मुद्दाम केलेला नाहीये. लेखिका स्त्री असल्यामुळे सर्व लेखनाला स्त्रीसुलभता आली आहे. परंतु स्त्रीसुलभ भावभावनांचं भांडवल किंवा स्त्रीस्वातंत्र्यवादींचा आक्रोश या लेखनात आढळत नाही. पुरुष आणि त्याची नजर, त्याच्या नजरेतले स्त्रीला जाणवणारे बदल हे सहजस्मरणांतून या लेखांत निरीक्षणाच्या स्वरूपात व्यक्त होतात.
हे लेखनच मुळात सहज समाधी सारखे आहे. कुमारवयीन प्रेमापासून ते केवळ प्रेम असा एक मानसिक प्रवासही यात दिसतो. जाणीवपूर्वक जगण्याच्या एका धाग्यातून दुसरा धागा, तिसरा धागा अशा गतीने हे लेखन पुढे पुढे सरकते. अमूर्ततेवर विश्वास असलेल्या या लेखिकेने स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा विचार करतांना ‘तिलाही कृष्ण हवा आहे’ असा अंत:प्रवाह आपल्या लेखनात कायम जिवंत ठेवला आहे. ज्या प्रदेशात लेखिकेचं वास्तव्य बदलत गेलं त्या त्या प्रदेशातली बोली भाषा या लेखनात अवतरत गेली आहे. लेखिका कुठेही नॉस्टॅल्जिक झालेली नाहीये पण वाचक मात्र नॉस्टॅल्जिक होईल असा हा विलक्षण वेगळा लेखन – आविष्कार आहे. लेखिकेला आपल्या अनुभवातून काही सांगायचं नाहीये; वाचकाला कुठले बोधामृत पाजायचे नाहीये. त्यामुळेच हे लेखन अत्यंत निर्मळ आणि सुंदर झालेले आहे.
रवीन्द्र दामोदर लाखे