Description
ज्ञानापासून जीवनसत्यापर्यंत आणि प्रेमभावनेपासून विज्ञान – तंत्रज्ञानापर्यंत सर्वत्र संचार करणाऱ्या मानवी जीवनाची व स्त्री जीवनाची असंख्य चित्रे अभिव्यक्त करणारे हे कथाविश्व आहे. स्वतंत्र विचाराने जगतानाही एकमेकांना जाणूनच हे जगणे सुंदर व अर्थपूर्ण बनवता येते, याची सूक्ष्म जाणीव वाचकांच्या मनात निर्माण करण्याची क्षमता या कथांमधून सूचित होते. तरल भावाभिव्यक्ती, कालसंगत बदललेले विचार, तत्त्वाशी तडजोड न करणारी भूमिका, चिमुरड्यांचे भावविश्व, नात्यांमधील कोवळिकता, माणसांइतकीच निसर्गातून प्रकटणारी प्रेमातील समर्पण भावना, नवे तंत्रज्ञान आणि अनुभवातून बदलणारी जीवनदृष्टी या सर्वांच्या केंद्रस्थानी येणाऱ्या स्त्रीची होणारी घुसमट आणि व्यक्तिगणिक मनोमन उमटणारी भावनिक आंदोलने उभी करण्याचे सामर्थ्य विजया दीक्षित यांच्या कथांमधून प्रत्ययाला येते. यातील बहुतांश कथा स्त्रीकेंद्री असूनही स्त्री-पुरुष नात्यातल्या समंजसपणावर भर देतात. विजया दीक्षित यांची वेदकालाला यथातथ्य चित्रित करणारी व सुखाची लिपी प्रत्ययकारकपणे उमटविणारी मोहक आणि लोभस शब्दकळा या कथांना वेगळी झळाळी प्राप्त करून देते. काळाच्या विस्तीर्ण पटावरील उलगडत गेलेली स्त्रीरूपे तिच्या अंतरंग स्पर्शासह जिवंत करणारे हे कथा विश्व वाचकाला आनंद तर देतेच, पण विचार करायलाही भाग पाडले. कोणतेच विषय वर्ज्य न मानणाऱ्या या कथा निरंतर मनात निनादत राहतात आणि तेच विजया दीक्षित यांच्या कथालेखनाचे बलस्थान आहे.
– सतीश बडवे