Description

गेल्या काही दशकात खेड्यापाड्यातल्या जगण्याचा गुंता अधिकाधिक वाढताना दिसतो आहे. एका बाजूने सनातन वाटावी अशी निसर्ग व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूने मानवनिर्मित सुलतानी, यात कायम भरडला जाणारा सर्वात तळातला मातीतला माणूस, हा संजय जगताप यांच्या कथेचा केंद्रबिंदू आहे. विना-अनुदानित शाळा कॉलेजात काम करणारा शेतकरी कुटुंबातला तरुण, दुष्काळात होरपळला जाणारा शेतकरी, भ्रष्ट वैद्यकीय शासकीय व्यवस्थेत पिचला जाणारा खेडूत, जुन्या आणि नव-नव्या अनिष्ट परंपरात अडकत जाणारी अज्ञानी, तरीही निरागस माणसांची व्यवस्था, या कथांमधून खूप नेमकेपणाने आली आहे.

लेखकासमोर सगळ्यात मोठे आव्हान असते ते आपल्या वर्तमानाला समजून घेणे. समष्टीचा आवाज शोधत जातानाच लेखक, कलावंत मूळ प्रश्नाकडे जात असतो. त्यातूनच तो व्यापक अशा मानवी दुःखाचा शोध घेऊ लागतो. अशावेळी येणारी पात्रे, प्रसंग हे निमित्तमात्र असतात. वेदनेचे वाहक असतात. जगताप यांची कथा या अर्थाने मातीतल्या खोलवर पसरलेल्या दुःखाचा शोध घेणारी कथा आहे. समग्र गावगाडा हा त्यांच्या कथेचा आस्थाविषय आहे. बदलत्या गावगाड्याचा देखील शोध घेणारी ही कथा आहे. ग्रामपंचायत निवडणुका, आडते, शिक्षण व्यवस्था, बाजारपेठा याविषयी विचार करणारा ‘नवा माणूस’ या कथांमधून सतत डोकावताना दिसतो. हे या कथेचे महत्त्वाचे यश आहे.

भाषा हे देखील या कथेचे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. खूप सहज आणि डौलदार मराठवाडी भाषेतून ही कथा प्रवाही होत, वाचकांशी काही बोलू पाहते आहे. तिचे हे बोलणे एका सुजन- व्यवस्थेविषयीचे बोलणे आहे. ते समजून घेणे म्हणजेच ही कथा आणि सभोवताल समजून घेणे. – श्रीकांत देशमुख

Additional information

Book Author