Description

आपल्याकडे कवितेचा विचार आशयनिष्ठ, रूपनिष्ठ आणि दोहोंचा समन्वय साधून करणारे समीक्षक दिसतात. प्रस्तुत लेखक आशय आणि रूप वेगळे मानत नाही. आशय रूपित असतो आणि रूप आशयपूर्ण असते; रूपाशिवाय आशय नाही आणि आशयाशिवाय रूप नाही; सूक्ष्मातिसूक्ष्म रूपविशेष उलगडून दाखवण्याच्या प्रक्रियेतच आशयाचे सूक्ष्मातिसूक्ष्म पदर उलगडत जातात; उलट आशयाची समृद्धता व्यंजक अभिव्यक्तिविशेषांशी म्हणजे व्यामिश्र रूपाशी संबद्ध असल्याचे दाखवल्याशिवाय ती जाणवत नाही, असा आपला अनुभव आहे. तेव्हा आशय आणि रूप यांचे अस्तित्व आणि स्वरूप एकमेकांवर अवलंबून असते. काव्य रचणाऱ्या कवीने सर्व प्रकारे रसपरतंत्र होऊन काव्य रचावे, असे जेव्हा आनंदवर्धन सांगतो तेव्हा त्याला अनुरूप अभिव्यक्तिविशेषांचा, रूपविशेषांचा सर्वप्रकारे अवलंब करावा, असे सुचवायचे आहे, असे आज म्हणता येईल. तेव्हा काव्याचा केवळ आशयाच्या वा रूपाच्या अंगाने केलेला विचार हा एकांगी ठरेल. येथे असा एकांगीपणा टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका अर्थाने हा कवितेच्या उभय अंगांचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. कवितेचा रूपशोध हा आशयाच्या शोधावाचून पुरा होत नाही आणि आशयाला प्राप्त होणाऱ्या काव्यात्म रूपाविषयी, सौंदर्यरूपाविषयी बोलल्याशिवाय कवितेविषयी बोलल्यासारखे होत नाही, अशी प्रस्तुत लेखकाची धारणा आहे.

Additional information

Book Author