या पुस्तकाविषयी
Gandhari (गांधारी) – N. D. Mahanor (ना. धों. महानोर)
रानातल्या कविता’ आणि ‘वही’ या संग्रहांतील अम्लान निसर्गकवितांनी रसिकाला एक अपूर्व आनंद दिला. या कवितांची मुळे ज्या परिसरात रुजलेली आहेत त्या परिसराच्याच रंगच्छटा ‘गांधारी’ या कादंबरीत अधिक गडदपणे व्यक्त झाल्या आहेत. ‘रानातल्या कवितां’ तील कितीतरी धूसर संदर्भ ‘गांधारी’त उजळून निघतात. कवी ना. धों. महानोर यांच्या प्रतिभेचे एक नवे रूप या दृष्टीने ‘गांधारी’ लक्षणीय आहेच; पण तिला एक स्वतःसिद्ध महत्त्वही आहे
निजामी राजवट संपुष्टात आल्यानंतर एका खेड्यात झालेल्या परिवर्तनाची कथा ती प्रत्ययकारी रीतीने सांगते. त्या राजवटीत अनेक उत्पातांना तोंड देऊनही जिवंत राहिलेले, पुन्हा तरारलेले, हे खेडे आहे. ते असे राजकीय संदर्भात उभे करीत असतानाच त्याच्या सामाजिक जीवनाकडेही लेखकाने लक्ष दिले आहे. वेगवेगळी माणसे आणि त्यांचे परस्परसंबंध यांतून हे सामाजिक जीवन रेखाटले जाते.
या माणसांत सर्वात अधिक लक्ष वेधून घेतो तो भागवत. ही ‘गांधारी’ तील केंद्रीभूत व्यक्तिरेखा शेवटी सगळी माणसे त्रिज्यांसारखी या केंद्रबिंदूला येऊन भिडतात. महानोरांच्या कवितांतून व एरवी जाणवणाऱ्या, त्यांच्या सौम्य व संवेदनाक्षम व्यक्तिमत्त्वाचीच भागवत ही एक प्रतिमा आहे असे म्हणावे का?- हे सौम्य व्यक्तिमत्त्वच या कादंबरीला कोठेही सनसनाटी किंवा भावविवश होऊ देत नाही. या ठिकाणी महानोरांना त्यांच्या साध्या, कोठेही अतिरिक्तपणे काव्यात्म न होणाऱ्या, गद्याचेही चांगले सहकार्य लाभले आहे. या सगळ्यामुळेच ‘गांधारी’ ही मराठीतील एक वेधक प्रादेशिक कांदबरी ठरेल याबद्दल कोणताही संदेह वाटत नाही.
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.