या पुस्तकाविषयी
जयंत पवार यांच्या प्रस्तुत लेखसंग्रहात संपादित केलेले लेख, भाषणे आणि मुलाखती आजच्या महत्त्वाच्या वाङ्मयीन प्रवृत्तीचा आणि प्रवाहांचा सर्वंकष परिचय करून देतात. नाटककार, कथालेखक, समीक्षक, भार्षांतरकार, पत्रकार म्हणून बिनीचा ठरलेला आणि इतर अनेक क्षेत्रांत मौलिक साहित्यनिर्मिती करणारा हा प्रतिभावंत आणखी किती संबंधित वैचारिक भूमिका पार पाडू शकतो, याचे आजच्या मराठी समाजाने केलेल्या प्रगतीचे हे उत्तम उदाहरण आहे. 'लालबाग-परळ'मधल्या कामगार बस्तीची पार्श्वभूमी लाभलेला गरीब मुलगा या परिघावरच्या मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करत मराठी साहित्यात स्वतःची वाट पाडून एवढे योगदान करू शकला, ही आपल्या समाजाची आशावादी घटना ठरते. अशा आत्मनिष्ठ लेखकांमुळेच मराठी समाजात जातिवादी, फॅसिस्ट आणि बुरसटलेली मूल्ये समाजाच्या केंद्रस्थानी येऊ शकणार नाहीत. जयंत पवारांच्या सगळ्याच लेखांमधून आणि मुलाखतींमधून विद्रोही सूर उमटतो. अनेक पुरोगामी गटांच्या लेखकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती, हेही कळते.
अफाट वाचन, व्यासंगी वृत्ती, देशापरदेशातल्या बौद्धिक प्रवृत्ती, चळवळी लघुपत्रिकांचे गट, जुने-नवे श्रेष्ठ ग्रंथ जिभेवर असणे, चित्रकला, सिनेमा आणि मराठीबरोबरच हिंदी, कन्नड वगैरे भारतीय भाषांमध्ये गाजलेल्या लेखकांचा गहिरा प्रभाव त्यांच्या विचारांवर उमटलेला आहे. लहानपणच्या कष्टकरी संस्कारांमुळे अस्वस्थ करणारे नेणिवांमधले संवेदन त्यांच्या शेवटपर्यंतच्या लिखाणात आहे. दिवसेंदिवस बधिर होत चाललेले आपले सांस्कृतिक जीवन इतक्या कमी आयुष्यात ओळखून आपल्या अप्रतिम वास्तवदर्शी शैलीत अभिव्यक्तीची जयंत पवारांनी गाठलेली उंची स्तिमित करणारी आहे. त्यांच्या स्मृतीस एक समविचारी म्हणून माझा प्रणाम.
भालचंद्र नेमाडे
मुंबई, ८ ऑगस्ट २०२४
पुस्तकाची छायाचित्रे
लेखकाविषयी
अभिप्राय आणि मानांकन
अजून अभिप्राय नाही — या पुस्तकाबद्दल तुमचे मत नोंदवणारे पहिले व्हा.
अभिप्राय लिहिण्यासाठी साइन इन कराइथे अजून काही लिहिलेले नाही.